नवी दिल्ली – “देशातील जनता, निवडणुकांचे निकाल विरोधकांना नक्कीच एका व्यासपीठावर आणतील, असे मला वाटायचे, पण तसे झाले नाही. परंतु, ईडीचे(सक्तवसुली संचलनालय) आभार मानले पाहिजेत, कारण ईडीमुळेच विरोधकांचे सुर जुळाले व ते एकत्र आले आहेत,’ अशी सडकून टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केली. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. मात्र, या भाषणात मोदींनी उद्योगपती गौतम अदानींबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांबाबत साधा “ब्र’ देखील काढला नाही.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत असल्याचा आरोप करताना, “पंतप्रधानांच्या बोलण्यातून सत्य दिसून येते. जर अदानी त्यांचे मित्र नसतील तर याप्रकरणाच्या चौकशीची घोषणा त्यांनी करायला हवी होती,’ असेही त्यांनी म्हटले.
शेरोशायरीतून फटकेबाजी
आपल्या 85 मिनिटांच्या भाषणात मोदींनी अनेक मुद्यांना हात घालताना शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, मी काल राष्ट्रपतींचे अभिभाषण पाहत होतो. त्यानंतर झालेल्या काहींच्या भाषणावेळी त्यांचे समर्थक उड्या मारत होते. खूप आनंदी होते. काहींनी “ये हुई ना बात’ म्हणून शाबासकीही दिली. काल त्यांना चांगली झोप लागली असावी व त्यामुळे कदाचित आज ते उठू शकले नाही, असे टीकास्त्रही मोदींनी विरोधकांवर सोडले.
मोदींचे भाषण दृष्टीक्षेपात
1. विरोधकांकडून राष्ट्रपतींचा अपमान; यातून आदिवासी समाजाप्रति द्वेष प्रतित
2. भाषणात काका हाथरसी आणि दुष्यंत कुमार यांच्या शायरीचा वापर
3. देशात सर्वत्र विश्वास असताना काही लोक नैराश्यात
4. हार्वर्डमध्येच नव्हे तर अन्य मोठ्या विद्यापीठांमध्येही कॉंग्रेसच्या पतनावर अभ्यास होईल
5. सत्तेत बसणारे विरोधातही अपयशी ठरले
6. तिरंग्यामुळे शांतता भंग होण्याचा धोका काहींना वाटला
7. 2004 ते 2014 या काळात भारताची अर्थव्यवस्था ढासळली.
8. 2010 मधील राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळांमुळे भारत जगात बदनाम झाला.
9. निवडणुक आयोग, न्यायालय अशा सर्वांना विरोधकांच्या शिव्या
मोदी पुढे म्हणाले, “यूपीएच्या 10 वर्षांत सर्वाधिक घोटाळे झाले. त्यांच्या निराशेचे कारण म्हणजे देशाची खरी क्षमता समोर येत आहे. 2004 ते 2014 पर्यंत यूपीएने प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर केले. जेव्हा तंत्रज्ञान व माहितीचे युग वाढत होते, त्याच वेळी ते “2-जी’ घोटाळ्यात अडकले. तर नागरी अणुकराराच्या चर्चेदरम्यान ते “कॅश फॉर व्होट’मध्ये अडकले होते.’
भारत जोडो यात्रेवर टिप्पणी
जे नुकतेच जम्मू-काश्मीरमधून आले, त्यांनी तिथे मोठ्या थाटामाटात कसे जाता येते हे पाहिलेच असेल. गेल्या शतकात मी जम्मू-काश्मीरमध्येही यात्रा काढली होती आणि लाल चौकात तिरंगा फडकविण्याची शपथ घेतली होती.
दहशतवाद्यांनी विरोध केला. परंतू, मी 26 जानेवारीला स. 11 वाजता लाल चौकात सुरक्षेशिवाय, बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय येईन, असे सांगितले व तिथे गेलो. आज आपण जम्मू-काश्मीरला शेकडोंच्या संख्येने जाऊ शकतो. अनेक दशकांनंतर तेथील पर्यटनाचेही अनेक विक्रम मोडले गेले आहेत.
मोदींवरील विश्वास वृत्तपत्रांच्या मथळ्यातून नाही
मोदींना शिव्या देऊन व चिखलफेक करून मार्ग सापडेल, असे अहंकारात बुडालेल्या लोकांना वाटते. 22 वर्षे उलटून गेलीत, तरीही त्यांचा गैरसमज जात नाही. मोदींवरचा विश्वास वृत्तपत्रांच्या मथळ्यातून जन्माला येत नाही. देशातील जनतेसाठी, देशाच्या भवितव्यासाठी आम्ही आयुष्य खर्ची घातले आहे.
PM Modi Jacket : पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची सर्वत्र चर्चा! जाणून घ्या…काय आहे कारण
देशवासीयांचा मोदींवरचा विश्वास त्यांच्या आकलनापलीकडचा आहे. मोफत रेशन मिळविणारे 80 कोटी भारतीय हे खोटे आरोप करणाऱ्यांवर कधी विश्वास ठेवतील का? 11 कोटी शेतकरी ज्यांच्या खात्यात वर्षातून तीनदा पैसे जमा होतात, त्यांचा तुमच्यावर विश्वास बसणार नाही, असेही मोदींनी म्हटले.
जॅकेटमधून पर्यावरण जतनाचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी परिधान केलेले निळ्या रंगाचे जॅकेट सर्वांचे आकर्षण ठरले. कारण, हे जॅकेट कापडाचे नसून पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले गेलेले होते.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) बेंगळुरू येथील “इंडिया एनर्जी वीक’मध्ये मोदींना हे जॅकेट भेट केल होते.
Adani Case : माकप खासदाराचा मोदी सरकारला इशारा, म्हणाले “अन्यथा मिस्टर अदानी तुम्हाला…”
प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून बनवलेल्या व पर्यावरण जतनाचा संदेश देणाऱ्या या जॅकेटची किरकोळ बाजारात किंमत अवघी 2,000 रुपये आहे. या जॅकेटचे फॅब्रिक “श्री रेंगा पॉलिमर्स’ या तामिळनाडूच्या करूर येथील कंपनीने बनवले होते.