PM Modi Jammu: कलम 370 ही जम्मू-काश्मीरच्या विकासातील सर्वात मोठी भिंत होती, ही भिंत भाजप सरकारने पाडली आहे. ते हटवल्यानंतर राज्यातील जनतेला त्याचे समाधान मिळाले. 370 हटवल्यानंतर महिलांना ते अधिकार मिळाले, जे यापूर्वी त्यांना मिळाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) मंगळवारी जम्मू शहरातील एमए स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी येथे 32 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.
पीएम मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये असे दिवस होते की शाळा जाळल्या जात होत्या, मात्र आज शाळा सजवल्या जातात. यापूर्वी गंभीर आजारावर उपचारासाठी दिल्लीला जावे लागत होते. पण आता जम्मूमध्येच एम्स तयार आहे.
जम्मू-काश्मीरमधून बंदुका, अपहरणाच्या बातम्या येत असत –
पीएम मोदी म्हणाले की, एकेकाळी जम्मू-काश्मीरमधून बॉम्ब, बंदुका, अपहरण, फुटीरतावादाशी संबंधित बातम्या येत होत्या. मात्र आता जम्मू-काश्मीर विकासाच्या संकल्पाने पुढे जात आहे. आता आम्ही विकसित जम्मू-काश्मीरची शपथ घेतली आहे. मला तुमच्यावर विश्वास आहे की आपण जम्मू-काश्मीरचा विकास करू. गेल्या 70 वर्षांपासून अपूर्ण राहिलेली तुमची स्वप्ने येत्या काही वर्षांत मोदी पूर्ण करुन देणार.
जम्मू-काश्मीर घराणेशाहीच्या तावडीतून मुक्त झाले – पंतप्रधान मोदी
जम्मू-काश्मीर घराणेशाहीचे बळी झाला होता. आता राज्य घराणेशाहीच्या तावडीतून बाहेर येत आहे. जम्मू-काश्मीरला अनेक दशकांपासून घराणेशाहीच्या राजकारणाचा फटका सहन करावा लागला. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची काळजी होती. लोकांच्या हितासाठी नाही, लोकांच्या कुटुंबांसाठी नाही… या घराणेशाहीच्या राजकारणातून जम्मू-काश्मीरला स्वातंत्र्य मिळत आहे याचा मला आनंद आहे.
तो दिवस दूर नाही जेव्हा देशवासीय रेल्वेने काश्मीरला पोहोचतील –
आज एक ट्रेन श्रीनगर ते सांगलदान आणि सांगलदान ते बारामुल्लासाठी रवाना झाली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा देशवासीय रेल्वेने काश्मीरला पोहोचतील. आज काश्मीरला पहिली इलेक्ट्रिक ट्रेन मिळाली आहे. तसेच जम्मू-काश्मीरला दोन वंदे भारत ट्रेनची सुविधा देण्यात आली आहे.
यावेळी पंतप्रधानांनी डोगरी भाषेत भाषण सुरू केले. पुन्हा एकदा जम्मूमध्ये आल्याने खूप बरे वाटल्याचे त्यांनी डोगरी भाषेमध्ये सांगितले. त्यांनी डोगरी भाषेतील कवयित्री पद्मा सचदेव यांचाही उल्लेख केला, ज्यांनी ‘मिठी ए डोगरे दी बोली, खंड मिठे लोग डोगरे’ असे म्हटले. पीएम मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरशी माझे चाळीस वर्षांपासून संबंध आहेत.
डिसेंबर 2013 मध्ये एमए स्टेडियममध्येच आव्हान रॅली काढण्यात आली होती-
पीएम म्हणाले, मी डिसेंबर 2013 मध्ये भाजपच्या ललकार रॅलीत सहभागी झालो होतो, तेव्हा जम्मूमध्ये आयआयटी आणि आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्था का बांधता आल्या नाहीत, असा प्रश्न मी उपस्थित केला होता. ती आश्वासने आम्ही पूर्ण केली आणि आज जम्मूमध्ये आयआयटी आणि आयआयएम आहे. त्यामुळे मोदींची हमी म्हणजे हमी पूर्ण होण्याची हमी असे लोक मानतात.
संबोधन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षण, रेल्वे, विमान वाहतूक आणि रस्ते क्षेत्राशी संबंधित 32,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी इलेक्ट्रिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि सांगलदान स्टेशन ते बारामुल्ला स्टेशन दरम्यान रेल्वे सेवा सुरू केली, ज्यामुळे या प्रदेशाची कनेक्टिव्हिटी आता वाढण्यास मदत होणार आहे.
याव्यतिरिक्त, त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1500 नवीन सरकारी नियुक्त्यांना नियुक्तीचे आदेश दिले. विकसित भारत विकसित जम्मू कार्यक्रमाच्या सर्वसमावेशक स्वरूपावर भर देत पंतप्रधानांनी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी सक्रिय संवाद यावेळी साधला.