संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमधून भाजपला कानपिचक्या
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भाजपला नेहमी तारू शकत नाहीत. वाईट उमेदवाराला चांगल्या पक्षाच्या नवालौकीकाचा लाभ मिळणार नाही. राक्षस तो राक्षसच, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझरने भाजपाला कानपिचक्या दिल्या आहेत.
देशाच्या राजधानीत भाजपाच्या झालेल्या पराभवाची मिमांसा याच्या संपादकीय लेखात करण्यात आली आहे. त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पक्षाला विधानसभा निवडणुकीत नेहमी विजयी करू शकत नाहीत. लोकांच्या भावनांचा विचार करून पक्षाची राजधानीत फेरबांधणी हाच पक्षापुढे पर्याय आहे, असे यात म्हटले आहे.
शाहीनबाग प्रकरणातील प्रचार भाजपाच्या मदतीला धावून आला नाही कारण त्या वादापासून केजरीवाल यांनी स्वत:ला अलिप्त ठेवले. मात्र या निवडणुकीत केजरीवाल यांनी घेतलेल्या भगव्या अवतारावर संपादक प्रफुल्ल केतकर यांनी लक्ष ठेवण्यास बजावले आहे. का कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम मुलतत्ववाद उफाळला होता. त्याला केजरीवाल कसे सामोरे जातात? त्यांचे हनुमान चालीसा पठण किती काळ चालू राहते याकडे लक्ष ठेवावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाने 2015च्या निवडणुकीतील पराभवापासून बोध घेत तळागाळापासून पक्षाची फेरबांधणी करायला हवी होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच या निवडणुकीत अपयश आल्याचे या लेखात स्पष्ट केले आहे.