पिंपरी – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना हक्काचा निवारा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्तपुढाकाराने पंतप्रधान आवास योजना राबवून 3 हजार 664 घरे बांधून देण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. मात्र, सदनिका हस्तांतरणाची मुदत संपून गेल्यानंतर लाभार्थ्यांना अद्याप घरांचा ताबा मिळालेला नाही. लाभार्थ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून हप्ते सुरू झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे घरासाठी लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागली आहे.
पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असल्यामुळे याठिकाणी कष्टक-यांची संख्या मोठी आहे. गेली तीस ते चाळीस वर्षे काम करून देखील हक्काचे घर घेणे अनेकांना शक्य झाले नाही. आर्थिक दुर्बलतेमुळे कामगारांवर कायम भाडोत्री घरात राहावे लागते. या कष्टकरी वर्गाला हक्काचा निवारा मिळावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने चऱ्होली येथे 1 हजार 442, बोऱ्हाडेवाडी येथे 1 हजार 288 आणि रावेत येथे 934 सदनिका बांधण्याचा आराखडा तयार केला. 6 सप्टेंबर 2019 मध्ये प्रत्यक्ष कामाचे आदेश देण्यात आले.
बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पातील सदनिका हस्तांतरणासाठी 31 जुलै 2022 ही मुदत देण्यात आली होती. सध्या चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथील दोन्ही प्रकल्पाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील सदनिकांसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांकडून दोन वेळा अर्ज मागविण्यात आले. 15 एप्रिल 2022 मध्ये लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्याचे आवाहन करण्यात आले. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पात्रतेनुसार लाभार्थ्यांनी 57 हजार 100 रुपये प्रत्येकी स्वहिस्सा भरला.
उर्वरित रक्कम भरण्यासाठी बॅंकेकडून कर्ज काढले. कर्जाचे हप्ते सुरू झाले तरी देखील घराचा ताबा मिळलेला नाही. एकीकडे कर्जाचे हप्ते आणि दुसरीकडे आर्थिक दुर्बलतेमुळे भाडोत्री घराचे भाडे भरणे अनिवार्य झाल्यामुळे कष्टकरी वर्गाला असा दुहेरी फटका बसत आहे.
हस्तांतरणास सहा महिन्यांची मुदतवाढ
आवास योजना प्रकल्पातील प्रत्येक घरासाठी केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये, राज्य सरकारकडून एक लाख रुपये अनुदान जाहीर झाले आहे. उर्वरित पाच लाख 77 हजार रुपयांचा हिस्सा लाभार्थींना स्वतः भरायचा आहे. प्रत्येकी 30 चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंत घरकुल असणार आहे. घरे हस्तांतरणाची मुदत 31 जुलै 2022 पर्यंत देण्यात आली. आता ही मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अत्यंत संथ गतीने प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांना पैसे भरून देखील मुदतीत घर मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी आवास योजना गृहप्रकल्पाच्या कामासाठी जागेचा अडसर होता. तो दूर करून हे काम करण्यासाठी काही कालावधी लागला. कोविड काळात राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी, प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यास विलंब झाला. तथापि, सदनिका हस्तांतरण मुदतीत होईल, याची काळजी घेतली जाईल.
– शिरीष पोरेड्डी, कार्यकारी अभियंता