बंगळुरू :- भारत व पाकिस्तान जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्याला हायव्होल्टेज सामना असे स्वरूप दिले जाते. कारण, दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात द्विपक्षीय मालिका खेळू शकत नाहीत. मात्र, यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत अन्य सामन्याप्रमाणेच हा सामनाही खेळला जावा, असे मत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले आहे.
मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो तेव्हा आम्हाला काही माजी क्रिकेटपटू सांगायचे की एकवेळ केनियाकडून पराभूत व्हा पण पाकिस्तानकडून नको. या अशा गोष्टींमुळेच खेळाडूंवर कमालीचे दडपण यायचे. मुळातच भारत व पाकिस्तान सामन्याकडे केवळ एक क्रिकेटचा सामना म्हणून पाहिले जात नव्हते तर त्यात वेगळीच टेन्शन दिसायची. मात्र, आता काळ बदलला आहे. दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे मग विनाकारण त्यांच्यावर दडपण टाकणे योग्य नाही, असे कुंबळे म्हणाले.
विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ एकदाही पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. यंदाही तेच चित्र कायम राहावे असे मलाही वाटते. मात्र, त्यासाठी खेळाडूंवर ताण येईल अशी मते टाळली गेली पाहिजेत. दोन शत्रूराष्ट्रांमधील सामना असे चित्र जरी भारत व पाक सामन्यांबाबत रंगवले जात असले तरीही यंदा मात्र आपल्या संघाने इतर अन्य सामन्याप्रमाणेच हा सामना खेळावा व विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच राखावी. दोन दशकांपूर्वीची स्थिती वेगळी होती, त्यावेळी भारत व पाकिस्तान संघात सामना सुरू असताना भर मैदानातही अनेकदा वाद घडले आहेत. तसेच एकमेकांविरुद्ध टीकाटिप्पणीही झाली आहे. आज ती परिस्थिती नाही, असेही कुंबळे यांनी सांगितले.
आशिया करंडक स्पर्धा तसेच विश्वकरंडक स्पर्धा यंदा होत आहेत व त्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी खेळणारही आहेत. त्यामुळे चाहत्यांना यंदाच्या मोसमात या दोन देशांत किमान चार लढती तरी पाहायला मिळतील. मात्र, प्रत्येकवेळी भारताने एक दबाव मनावर घेत मैदानात उतरु नये. दोन्ही संघांची तुलना केली तर ती एकसमानच वाटते. मात्र, पाकिस्तानला विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पराभूत करता आलेले नसल्याने उलट जास्त दडपण त्यांच्यावरच राहणार आहे, असेही कुंबळे म्हणाले.
समतोल संघ खेळवावा…
आशिया करंडक व विश्वकरंडक स्पर्धेत विनाकारण संघात प्रयोग केले जाऊ नयेत. सर्वोत्तम संघच मैदानात उतरवणे गरजेचे आहे. संघात परिपूर्ण फलंदाजांबरोबरच जास्त संख्येने अष्टपैलू खेळाडू असावेत. सध्याच्या क्रिकेटमध्ये ज्या संघाकडे जास्त अष्टपैलू असतात त्यांचेच पारडे जड राहते, असा सल्लाही कुंबळे यांनी दिला आहे.