नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणानंतर संपूर्ण विरोधी पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. दोन तास 12 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मोदींच्या संसदेतील भाषणावर वक्तव्य केले आहे.
संसद सदस्यत्व पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल म्हणाले, ‘काल पंतप्रधान मोदी संसदेत सुमारे 2 तास 13 मिनिटे बोलले. यामध्ये शेवटी ते मणिपूरवर फक्त दोन मिनिटे बोलले. मणिपूर अनेक महिने जळत आहे, लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत पण पंतप्रधान हसत होते, विनोद करत होते. हे त्यांना शोभत नाही. भारतीय सैन्य हे नाटक 2 दिवसात थांबवू शकते पण पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे आणि आग विझवायची नाही असा घणाघात राहुल गांधींनी यावेळी केला.
मणिपूरचा अनुभव सांगितला
राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले, ते मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मी संसदेत म्हटले होते की, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी भारत मातेची हत्या केली, मणिपूरमध्ये भारताचा खात्मा केला.मणिपूरमध्ये, जेव्हा आम्ही मेईटी भागाला भेट दिली तेव्हा आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले की आमच्या सुरक्षा दलांकडे काही कुकीज भागातील असतील तर त्यांना येथे आणू नका कारण ते त्या व्यक्तीला मारतील. जेव्हा आम्ही कुकी भागात गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की जर आम्ही मेईटी भागातील लोकांना आणले तर ते त्याला गोळ्या घालतील.’
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ‘पंतप्रधान किमान मणिपूरला जाऊ शकले असते, समुदायांशी बोलू शकले असते आणि म्हणाले की मी तुमचा पंतप्रधान आहे, चला आपण बोलूया ! 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होतील की नाही हा प्रश्न नाही, प्रश्न मणिपूरचा आहे जिथे मुले, लोक मारले जात आहेत. मला माहित आहे की मीडिया नियंत्रणात आहे, राज्यसभा, लोकसभा टीव्ही नियंत्रणात आहे पण मी माझे काम करत आहे आणि करत राहीन. जिथे जिथे भारत मातेवर हल्ला होईल तिथे तुम्हाला मी उपस्थित राहून भारत मातेचे रक्षण करताना दिसेल असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.