Ravichandran Ashwin : तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने क्राऊलीची विकेट घेत भारताचा अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळेला ( Anil Kumble ) मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 बळी घेणारा अश्विन दुसरा खेळाडू आहे. अश्विनने 500 विकेट्स घेऊन इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना मागे टाकले आहे.
सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये 500 कसोटी बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने केवळ 87 सामन्यात 500 विकेट घेतल्या होत्या. या यादीत अश्विन ( Ravichandran Ashwin ) आता दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने 98वी कसोटी खेळताना 500वी विकेट घेतली आहे. या यादीत 105 व्या कसोटीत 500 बळी घेणारा माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 108व्या कसोटीत 500वी विकेट घेतली होती, तो याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे.
सर्वात कमी चेंडूत 500 बळी
सर्वात कमी चेंडूंवर 500 कसोटी बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने 25,528 चेंडूत 500 बळी घेतले होते. अश्विनने 25714 चेंडू टाकून कसोटी क्रिकेटमधील 500वी विकेट घेतली. जेम्स अँडरसनने 28,150 चेंडू टाकून 500 कसोटी बळी घेतले. तर स्टुअर्ट ब्रॉडने 28,430 चेंडू टाकून 500 कसोटी बळी घेतले होते.
भारताचा सर्वात मोठा मॅच विनर…
अश्विनने 2011 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अश्विनने 500 वा कसोटी बळी मिळवला आहे. मात्र, गेल्या 13 वर्षांत अश्विन हा भारताचा सर्वात मोठा मॅच विनर ठरला आहे. अश्विनने 34 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 8 वेळा एका कसोटीत 10 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अश्विनने बॅटने अप्रतिम कामगिरी दाखवली असून 3300 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत आणि 5 शतकेही झळकावली आहेत.