पुणे – लॉकडाऊनमध्ये कामगार गावी गेले. त्यामुळे पाणी न मिळाल्याने देशभरातून पुण्यात आणलेला दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा कोमेजल्याची माहिती समोर आली आहे. आता या वनस्पतींच्या प्रजाती प्रत्यक्षात पाहता येणार नाहीत, याबद्दल बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे (बीसएसआय) वनस्पती शास्त्रज्ञदेखील हळहळले आहेत.
देशातील दुर्मीळ वनस्पतींचा अभ्यास, त्याचे विश्लेषण, संशोधन करणारी “बीएसआय’ ही प्रमुख संस्था पुण्यात आहे. तेथील शास्त्रज्ञांनी संशोधनातून देशभरातील दुर्मीळ वनस्पतींच्या स्थानिक प्रजाती येथे लावल्या. पण, मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे या वनस्पतींना पाणी देता आले. त्यामुळे पाण्याअभावी या वनस्पती पूर्णपणे कोमेजल्याची माहिती “बीएसआय’मधील अभ्यासकांनी दिली.
दुर्मीळ वनस्पतींचे महत्त्व
यातील काही वनस्पतींमध्ये फुले, फळांच्या विविध प्रजाती, तर काहींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. बहुतांश वनस्पती या फक्त भारतात सापडतात. या वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी त्यांची लागवड पुण्यात करण्यात आली होती. त्यांना स्थानिक दुर्मीळ प्रजातीतील वनस्पती (एंडेमिक प्लांट) म्हणतात. वनसंपदेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व अधिक असते.
…म्हणून कोमेजल्या वनस्पती
लॉकडाऊनमुळे अभ्यासक आणि देखभाल करणारे कंत्राटी कामगारांपैकी कोणालाच गेली दोन महिने संस्थेत जाता आले नाही. त्यामुळे या वनस्पतींची योग्य देखभाल झाली नाही. त्यापैकी बहुतांश झाडे कोमेजली, तर अनेक झाडे पूर्णत: नष्ट झाली आहेत.
या वनस्पती नष्ट
नष्ट झालेल्यांमध्ये पश्चिम घाट परिसर आणि श्रीलंकेत आढळणारी ल्युसिया टेनुफोलिया, सोबतच जिओडोरम डेन्सिफ्लोरम, एरिडेस माक्युलोसा या स्थानिक दुर्मीळ प्रजातील वनस्पतींचा समावेश आहे. या सर्व वनस्पती प्रजाती मुख्यत: ऑर्किड प्रकारातील आहेत.
दुर्मीळ वनस्पतींची लागवड करून ती जपण्याचे प्रयत्न “बीएसआय’तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काही वनस्पतींची लागवड केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे यापैकी बहुतांश दुर्मिळ वनस्पती नष्ट झाल्या आहेत. अतिशय दुर्मिळ प्रकारातील वनस्पती असल्याने त्या पुन्हा मिळणे जवळपास अशक्य आहे.
– डॉ. जीवन जलाल, वनस्पती शास्त्रज्ञ, “बीएसआय’