संत तुकाराम महाराज जीवनदर्शन परिसंवाद
पिंपरी – जागतिकीकरणाच्या युगात जगात एक विचार स्विकारण्यात आलेला नसल्याने पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद संतांच्या विचारसरणीत आहे. वैश्विक कुटुंबाची संकल्पना रुजवण्यासाठी आपल्याकडे संतांचा वारसा आणि विचार आहेत. त्याआधारे आपण जगाला एका विचारधारेत गुंफू शकतो, असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महापालिका संचलित टाळगाव चिखली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक प्रा. डॉ सदानंद मोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त “जगद्गुरू संत तुकाराम महाराज जीवन दर्शन ‘ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा डॉ. मोरे बोलत होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन आयुक्त तथा संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमास संतपीठाचे संचालक राजु महाराज ढोरे, अभय टिळक, स्वाती मुळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी उपस्थित होते. परिसंवादामध्ये संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प.संतोष महाराज बढेकर, हभप अभय जगताप, हभप आप्पा बागल, अमृता कोल्हे, सचिन पवार यांनी सहभाग घेतला होता.