पिंपरी – पावसाने चांगलीच ओढ दिली असून नागरिकांना मुसळधार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सकाळच्या वेळी आकाश निरभ्र दिसत असून दुपारनंतर नुसतेच पावसाचे ढग दाटून येत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास पाण्याचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
यंदा लहरी हवामानाचा चांगलाच फटका नागरिकांना बसला आहे. मे महिन्याच्या सुरवातीला उन्हाची चांगलीच तीव्रता होती. त्याचा फटका शेकऱ्यांना बसला. त्यामुळे टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला. तर मागील आठवड्यात पावसाचा शिडकावा होऊनही भाज्यांचे दर तेजित राहिले आहेत. तसेच तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठा मे महिन्यात सुमारे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तर, जूनमध्ये 19 टक्क्यांपर्यंत पाणी पातळी घटली होती. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत 30 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. आजच्या दिवशी मागील वर्षी हाच साठा 36.49 टक्के होता. तर, 1 जूनपासून पाणी साठ्यात 12.52 टक्के वाढ झाली आहे.
हिमालयापासून मध्य प्रदेशपर्यंत सध्या मान्सून जोरदार बरसत आहे. त्यामुळे त्या भागात पूर आलेला आहे. हा मान्सून ट्रफ उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली असून, अजून तीन ते चार दिवस लागतील. 14 ते 17 जुलैदरम्यान पाऊस वाढणार आहे. तर 17 ते 19 दरम्यान पाऊस अतिवृष्टीकडे जाईल आणि तो 24 जुलैपर्यंत राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
भाज्या कडाडल्या
पावसाने ओढ दिल्याने मंडईतील कांदा, लसूण, टोमॅटोसह पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाकले आहेत. कांदा जून महिन्यात शंभर रुपयांना दहा किलो होता. आता शंभर रुपयांना चार ते पाच किलोंवर आला आहे. लसूण शंभर रुपयांना दोन ते अडीच किलो होता. आता शंभर ते 150 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. 20 ते 30 रुपये किलो असलेल्या टोमॅटोने तर, उच्चांक गाठत 150 रुपये प्रतिकिलोवर पोहचला आहे. तर, पालेभाज्यांचे दर प्रतिगड्डी किमान 30 रुपयांवर पोहचली आहे.
धरण भरणार का?
प्रत्येक वर्षी 15 ऑगस्टपर्यंत धरण किमान एकदा तरी पूर्ण भरून वाहते. मात्र, यंदा अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी धरण पूर्ण क्षमतेने भरणार का? अशा प्रश्न आहे. कारण अद्याप मुसळधार पाऊस झालेला नाही. धरणातील पाणी साठा 35 टक्क्यांपर्यंतही पोहचलेला नाही. घाटमाथ्यावर पाऊस सुरू असला तरी, अद्यापाचा जोर नाही. शहराला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षाच आहे.
पाणी प्रश्न ?
पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणे अपेक्षीत आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ती नियमीत होण्याची नागरिक वाट पहात आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्यास तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, तर पाणी प्रश्न उद्भवण्याची शक्यात आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांपर्यंत पोहचली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार पवना धरणातील पाणी शहराला पुरेसे होत नाही.
पावसाची सरासरी
गेल्या 24 तासांत झालेला पाऊस 09 मिमी
1 जूनपासून झालेला पाऊस 644 मिमी
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस 574 मिमी
धरणातील सध्याचा पाणीसाठा 30.42 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठी 36.49 टक्के
1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ 12.52 टक्के