पिंपरी (प्रतिनिधी) – शहर स्वच्छतेसाठी वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने भरारी घेतली आहे. दोन वर्षांपासून शहराला 19 वा क्रमांक असताना यावर्षी देशात 13 वा, तर राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.
केंद्रीय विकास नागरी मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.11) दिल्लीत पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या वतीने देशात 2016 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी शहराचा स्वच्छतेमध्ये नववा क्रमांक आला. त्यानंतर शहर स्वच्छतेमध्ये सातत्याने पिछाडीवर गेले होते. महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरू करुन स्वच्छागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांना चालविण्यासाठी दिले.
स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची भरारी!!
शहराचा देशात 13वा तर राज्यात तिसरा क्रमांककेंद्रीय विकास नागरी मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते आज दिल्लीत पुरस्कार साेहळ्याचे वितरण झाले. महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आराेग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, pic.twitter.com/iuYJw2XRaX
— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) January 11, 2024
ओला, सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. जनजागृती केली. शहराच्या विविध भागात प्लॅगेथॉन मोहिम राबवून कचरा उचलला. सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणार्यांवर, थुंकणार्यांवर कारवाईसाठी ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक केली.
शहराला प्रथमच कचरा मुक्त शहरात पंचतारांकित मानांकन आणि हागणदारी मुक्त शहराचे सर्वोच्च वॉटर प्लसचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात क्रमवारी सुधारावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरवासीयांनी मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड अव्वलस्थानी आले आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. सेवा स्तर गुणांक, नागरिकांचा प्रतिसाद आणि कचरा मुक्त, हागणदारी मुक्त शहर या घटकांवरती केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षणातील यश हे शहरवासीयांसह आरोग्य, पर्यावरण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेष करून सफाई कर्मचार्यांचे आहे. आगामी काळात शहर कसे स्वच्छ राहील, याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
– यशवंत डांगे, सहायक आयुक्त, आरोग्य
स्वच्छ सर्वेक्षणात सन 2016 मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. 2017 मध्ये शहराचा 72 व्या क्रमांक आला होता. 2019 मध्ये 52 वा क्रमांक, 2020 मध्ये 24 वा क्रमांक, 2021 मध्ये 19 वा क्रमांक, 2022 मध्येही 19 वा क्रमांक कायम होता. 2023 मध्ये शहर स्वच्छतेमध्ये देशात 13 वे तर राज्यात तिसर्या क्रमांकावर आले आहे.