पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहत असून या तिन्ही नद्यांमध्ये जलपर्णीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. महापालिकेच्या वतीने जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून पावणेचार कोटींचा खर्च जलपर्णी काढण्यासाठी करण्यात येणार आहे. पवना नदीतील जलपर्णी काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
महापालिकेच्या हद्दीतून पवना नदीचे पात्र 24 किलोमीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलोमीटर पात्र आहे. या सर्वच भागात बेसुमार जलपर्णी वाढली आहे. जलपर्णी वाढल्याने नदी पात्र एखाद्या हिरव्यागार मैदानाप्रमाणे दिसून येत आहे. जलपर्णीमुळे नदी परिसरातील नागरिकांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जलपर्णी काढून नदीपात्र नियमितपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. या तिन्ही नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात येतो.
यंदाही दरवर्षीप्रमाणे जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी सहा पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पॅकेजमध्ये पवना नदीतील सांगवडे ब्रिज ते मोरया गोसावी बंधारा, पॅकेज दोन अंतर्गत पवना नदीपात्रातील मोरया गोसावी बंधारा ते कासारवाडी दत्त मंदिर, तिसऱ्या पॅकेजमध्ये पवना व मुळा नदीपात्रातील कासारवाडी दत्त मंदिर (सृष्टी चौक, पिंपळे- गुरव ब्रिज) ते बोपखेल बंधारा जलपर्णी काढली जाणार आहे.
चौथ्या पॅकेजअंतर्गत मुळा नदीपात्रातील वाकड ब्रिज सूर्या हॉस्पिटल ते दापोडी पवना- मुळा संगम, पाचव्या पॅकेज अंतर्गत इंद्रायणी नदीतील तळवडे येथील सिंटेल कंपनी ते बटवाल वस्ती, मोशी बंधारा, सहाव्या पॅकेज अंतर्गत इंद्रायणी नदीतील बटवाल वस्ती, मोशी बंधारा ते हिरामाता मंदिर, चऱ्होली एसटीपी प्रकल्प या भागातील जलपर्णी काढण्यात येणार आहे. यासाठी 3 कोटी 80 लाख 6 हजार 496 रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार पवना नदीतील जलपर्णी काढण्यास सुरूवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी म्हणजे येत्या पाच महिन्यात तिन्ही नद्यांमधील संपूर्ण जलपर्णी काढून घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
दरवर्षीचा खर्च
जलपर्णी हा पिंपरी-चिंचवडकरांसाठी दरवर्षीची डोकेदुखी ठरत आहे. हिवाळा सुरू होताच वाढणारी ही जलपर्णी महापालिकेचे आर्थिक आणि नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने नुकसान करणारी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपये दरवर्षी जलपर्णी काढण्यासाठी खर्च होतात परंतु पावसाळा सुरू होईपर्यंत संपूर्ण जलपर्णी निघत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास होत आहे, परंतु अद्याप यावर कायमस्वरुपी उपाय शोधण्यात अपयश आले आहे.