जाधववाडी – बोल्हाईमळा येथे मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त येत असल्याने जाधववाडीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
महापालिका नागरिकांकडून पाणीपट्टीसह विविध कर वसूल करत आहे. नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध आणि पिण्यास योग्य नसेल तर नागरिकांनी कर कशासाठी भरायचा असा प्रश्न नागरिक करत आहेत. जाधववाडीत दूषित पाणीपुरवठा होत असूनदेखील महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या पावसाळा सुरू नाही. त्यामुळे गढूळ पाणी येण्याचा काहीच संबंध येत नाही. पाणी पिवळसर दिसत असून त्याला उग्र वास येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्याचे आहे की ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसार, जुलाब, पोटदुखी आदी आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभार आणि समस्यांकडे दुर्लक्ष करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कर देऊनही नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्वरित समस्येची दखल घेऊन संबंधित विभागाला आदेश देऊन येथील समस्या सोडविण्यास सांगावी, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.