माजी महापौर योगेश बहल यांचे एकनाथ पवार यांना सडेतोड उत्तर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या जोरावर लाचखोरी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपकडून महापौर परिषदेच्या पुरस्कारावरून उर बडवून घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या सत्ताकाळात शहराचा सन्मान ज्यांनी धुळीस मिळविला ते आता विकासकामांच्या गप्पा मारत आहेत, ही मोठी शोकांतिका आहे. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि खंडणीखोरांची एखादी स्पर्धा घेतल्यास या भाजपच्या नेत्यांचा पहिला नंबर येईल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेस उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र महापौर परिषदेतर्फे “ब’ वर्ग महापालिकांच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर भाजपाचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रक काढून भाजपाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्याला आता बहल यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर देत भाजपावर सडकून टीका केली आहे.
याबाबत बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या वतीने महापालिकेला “ब’ वर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दलचा पुरस्कार दिला आहे.
ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या तीन महापालिका “ब’ वर्गात येतात. त्यामध्ये पहिला पुरस्कार मिळविल्याचा दावा पवार करीत आहेत. सन 2018-19 या वर्षांतील कामांसाठी हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक, या वर्षात केलेल्या ज्या योजनांबद्दल हा पुरस्कार मिळाला त्या योजना राष्ट्रवादीनक सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काळात शहराने देशपातळीवरच नव्हे तर आशिया खंडात आपला नावलौकीक मिळविला होता. हा नावलौकिक गेल्या पाच वर्षांत या भाजप मंडळींनी धुळीस मिळविला. या पक्षाचा स्थायी समितीचा अध्यक्ष लाच घेताना रंगेहात पकडला गेला. उपमहापौर खंडणी घेतल्यामुळे जेलमध्ये गेला. यांच्या पक्षाच्या आमदारांशी संबंधित “गुरुजी’ या संस्थेतीत झालेल्या गैरकृत्यामुळे अनेकांना जेलवारी करावी लागली.
सर्वांत प्रामाणिक असलेल्या कुत्र्यासारख्या प्राण्याच्या नसबंदीमध्येदेखील भ्रष्टाचार केल्याने शहराची मान शरमेने खाली गेली. भाजप नगरसेवकाच्या संबंधित श्रीकृपा या ठेकेदाराने निविदेसोबत बोगस कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक केली. शहराचा नावलौकीक धुळीस मिळविणारे आता पहिला क्रमांक आल्याचे सांगून श्रेय लाटतात यावरूनच ही मंडळी किती निर्ढावलेली आहेत हे देखील स्पष्ट होत असल्याचे बहल म्हणाले.