बारामती तालुक्यातील मानवीवस्ती, गावाकडे वळवला मोर्चा : भक्ष्य मिळवण्यासाठी धडपड
भवानीनगर -बारामती तालुक्यातील कण्हेरी भागातील शेती परिसरातच बिबट्याचा धुमाकुळ सुरू असल्याने शेतकरी त्याच्या भीतीने शेतात जात नव्हते; मात्र आता हा बिबट्या थेट मानवीवस्तीत आला आहे. मंगळवारी (दि. 11) पहाटे कण्हेरी गावातील रामचंद्र मारुती शिंदे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या कळपातील दीड वर्षांच्या मेंढी फस्त केल्याने बिबट्या आता शेतात नव्हे दारात आला म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या भागातील उसाचे क्षेत्र संपल्याने लपण्यासाठी जागा नाही, तसेच परिसरातील भक्ष्य संपल्यामुळे बिबट्याने खाद्य मिळवण्यासाठी आपला मोर्चा मानवी वस्ती, गावाकडे वळवला आहे.
कण्हेरीत बिबट्याने मेंढी फस्त केलेल्या घटनास्थळी वन विभागाचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी त्र्यंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, पिंपळी नर्सरी वनरक्षक संध्या कांबळे, वन कर्मचारी दत्तात्रय पाटोळे यांनी तसेच रेस्क्यू टीम पुणे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.
बारामती वन विभागाने कण्हेरी, काटेवाडी भागांमध्ये पिंजरे लावलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावलेले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे या भागातील असणारे कॅमेराच्या समोरून गेल्यास कॅमेरात बिबट्या कैद होऊन वनविभागाला या बिबट्याबाबत माहिती मिळणार आहे. परंतु या अगोदर या भागात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना आपले लक्ष्य केले असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
दर दोन दिवसाला बिबट्याने हल्ला केलेला निदर्शनात येत असल्याने बिबट्याने हल्ला करण्याचे सत्र थांबवणे कठीण होत आहे. या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे दिवस-रात्र सुरू असलेले प्रयत्नही आता आपुरे पडू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कण्हेरी (ता. बारामती) ःयेथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये एक मेंढी ठार झाली आहे. याची माहिती घेताना श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तात्यासाहेब देवकाते, बाळासाहेब पवार व ग्रामस्थ.