मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले.
तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा असून, सध्या शिंदे गटात आनंदाचे आवतावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचं हे कार्यालय असून, या कार्यालयातील आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहे.
सध्या सगळीकडे याचीच चर्चा रंगू लागल्याचे दिसून येत आहे. आता तिथे फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. मात्र अद्याप यावर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.