नगर – नगरकर खरंच इतके सहनशील आहेत की, आठ दिवस पाणी आले नाही, वर्षानुवर्ष तेच रस्ते आणि तेच खड्डे, बंद पथदिवे तरी ओरड नाही. एक तप लोटले, तरी शहराची वाढीव पाणीपुरवठा योजनांची कामे अद्यापही सुरू आहेत. अडीचशे कोटी रुपये खर्च झाले, तरी फेज टू व अमृत पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. या पाणी योजनांच्या कामाला 2010मध्ये सुरूवात झाली. ही योजना तीन वर्षांत पूर्ण करण्याचा कालावधी असताना आजही फेज टूचे काम सुरूच आहे. या कालावधीमध्ये सात महापौर अन् आठ ते दहा आयुक्त बदलले, तरी पाणीयोजनांची कामे सुरूच आहेत. दररोज त्याच त्या कारणामुळे पाणीपुरवठा योजनेत बिघाड होत असून, नगरकरांना पाण्यासाठी वणवण अजूनही करावीच लागत आहे.
यूआयडीएसएसएमटी, तसेच अमृत अभियानांतर्गत शहरासाठी सुधारित पाणीयोजनांचे काम हाती घेण्यात आले. त्यात “अमृत’चे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मागील 12 वर्षांपासून हाती घेण्यात आलेल्या फेज-2 योजनेच्या अंतर्गत जलवाहिन्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. केंद्र अन् राज्य सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आल्या; पण अजूनही त्यांची कामे रखडलेलीच. त्यामुळे पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळण्याचे नगरकरांचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे. मुळा धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो. विळद येथे पाण्याचे शुद्धीकरण करून पुन्हा पंपाद्वारे पाणी उचलून शहरातील वसंत टेकडी येथे आणले जाते. आता अमृत योजनेंतर्गत हे पाणी आणले जाणार आहे. मात्र, ते वितरित करण्यासाठी असलेल्या जलवाहिन्या अद्याप कार्यरत नाहीत. त्यामुळे नगरकरांचे पुरेसे आणि पूर्ण दाबाने पाणी मिळण्याचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे.
अन्य शहरामध्ये सुधारित पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होऊन नव्याने योजनांची कामे सुरू झाली आहेत. अमृत योजना अनेक शहरात पूर्ण झाल्या असून आता अमृत योजना- दोनदेखील सुरू झाली आहे. पण शहरात अद्यापही पहिल्याच अमृत योजनेचे काम सुरू आहे. एवढी लाजीरवाणी बाब असून, आम्ही अहमदनगरकर म्हणून घेत आहोत.
सात महापौर अन् आठ ते दहा आयुक्त बदलले, तरी काम अपूर्ण आहे. दि. 21 जून 2010 रोजी 116 कोटी 7 लाख 41 हजार 971 रुपयांच्या फेज-2 पाणीयोजनेच्या कामाला प्रारंभ झाला. हे काम तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम 12 वर्षांतही पूर्ण झालेले नाही. या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी पोचावे, म्हणून महापालिकेने 1 नोव्हेंबर 2017पासून अमृत पाणीयोजनेचे काम हाती घेतले.
अधिकृत नळजोड 62 हजार
शहरात सुमारे एक लाख मालमत्ता आहेत. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ 62 हजार अधिकृत नळजोड आहेत. उर्वरित नळजोड अनधिकृत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना दर वर्षी तोट्यात असते. दरवर्षी या योजनेवर तीस कोटींचा खर्च होत असला, तरी प्रत्यक्षात दहा कोटी रुपये एवढीच पाणीपट्टी वसूल होते.
18 पाण्याच्या टाक्या
शहरात केडगाव, कल्याण रोड, बुरुडगाव, सारसनगर, कोठला, आरटीओ, लालटाकी, सावेडी उपनगर आदी भागांत पाण्याच्या 16 टाक्या असून, वसंत टेकडी येथे पाणी आल्यानंतर शहरातील 18 टाक्या पाण्याने भरल्या जातात. शहरात 555 किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी आणि सुमारे एक हजार व्हॉल्व्ह आहेत. फेज टुच्या अंतर्गत जलवाहिन्याचे काम अजून अपूर्ण असल्याने या पाण्याच्या टाक्या कधी भरणार असा प्रश्न आहे. त्यामुळे नगरकरांना पुरेसे पाणी सध्या मिळत नाही.
फेज-2 पाणी योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले असून, ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आताही बऱ्यापैकी काम झाले आहे. मात्र, जेवढे काम झाले त्याचे पैसे देणे बाकी आहे. तरी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून नगरकरांना पूर्ण दाबाने व पुरेसे पाणी देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
– पंकज जावळे, आयुक्त