पुणे – आग लागल्याशिवाय किंवा दुर्घटना झाल्याशिवाय आमची कोणाला आठवण येत नाही, असे असले तरी दीपावलीचा आनंद साजरा करीत असताना जनतेने आमची आठवण ठेवून आमच्यासाठी केलेली भाऊबीज हा प्रत्येक अग्निशमन दलाच्या जवानांच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.
भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अग्निशमन दलाच्या जवानांना ओवाळून भाऊबीज साजरी करण्यात येते. त्याप्रसंगी प्रशांत रणपिसे बोलत होते. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या जवानांचे औक्षण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना अग्निशमन दलाच्या कर्तव्यतत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेली 26 वर्षे सलत हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली.
अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे सांगितले.आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले, तर नितीन पंडित यांनी आभार मानले.