पुणे – दिवाळीपूर्वी राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीचे परिणाम आता हळूहळू जाणवू लागले आहेत. त्यामुळे करोनाची दुसरी लाट आली तर “ती जनतेनेच ओढवून घेतली’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. “करोनाची दुसरी लाट घेऊन येणे किंवा “तिला थोपवणे’ हे जनतेच्याच हाती आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
करोनाविषयक सुरक्षेच्या सूचना डावलल्याचे परिणाम युरोपमधील अनेक देश भोगत आहेत. त्यांना दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीत उद्भवली असून दिल्लीत करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात पहिली लाट ऑक्टोबरमध्ये ओसरण्यास सुरवात झाली. मात्र, त्याचवेळी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी याआधीच वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी यंदाचा दिवाळी सण सोशल डिस्टन्सिंगने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा वारंवार करत होती.
मात्र, शहर किंवा ग्रामीण भागात कोठेही या नियमांचे पालन होताना दिसले नाही. उलट गर्दीच्या ठिकाणी उभे राहून नागरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. तर काही नागरिकांन तोंडाला मास्क न लावता फिरत होते. काही राजकीय पक्षांना मंदिर उघडण्याची व तेथे ढोल बडविण्याची घाई झाली होती. आता मंदिरे उघडल्यानंतर त्याठिकाणी दर्शनासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातील सारस बाग आणि मंदिर बंद ठेवावे लागले.
…तर 25 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान करोनाची दुसरी लाट?
दिवाळीमध्ये नागरिकांनी बाजारपेठांमध्ये केलेली गर्दी, करोना संरक्षक नियम तुडवून बिंधास्तपणे बाहेर फिरणे याचे परिणाम पुढील आठ ते दहा दिवसांत दिसतील. त्यामुळे काही तज्ज्ञांनी डिसेंबरच्या सुरवातीपासूनच हा संसर्ग वाढण्याची भीती दर्शविली आहे. तर काही तज्ज्ञांनी 25 डिसेंबर ते 26 जानेवारीदरम्यान करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. थंडीमुळे सर्दी, ताप, खोकल्याचे आजार वाढले असून नागरिक घरच्याघरी उपचार करत असल्याचे दिसून येते. दरम्यान, राज्य शासनाने राबविलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेचा निश्चित फायदा झाला. आता गरज आहे ती नियमांचे पालन करण्याची.
करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या संसर्गाची लक्षणे वेळोवेळी बदलत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत या विषाणूचे स्वरूप वेगळे असू शकते. त्यामुळे नागरिकांनी या आजाराबाबत बेफिकिर राहू नये. अन्यथा दुसऱ्या लाटेला सामोरे जायला अवघड होईल.
– के. एच. संचेती, संचेती रुग्णालय
अनलॉकनंतर दिवाळीमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार नागरिकांना सुरक्षिततेबाबत आवाहन केले जात होते. मात्र, नागरिकांनी तेवढ्या गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत रुग्णसंख्या कशी वाढते, त्यावर दुसऱ्या लाटेची दाहता समजेल. दुसरी लाट येऊ न देणे जनतेच्या हातात आहे. लक्षणे दिसतातच तत्काळ उपचार करून घ्यावे. प्रशासनाने सर्व शक्यता लक्षात घेऊन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
– डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक
नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाही. शहरातील वाढत्या गर्दीमुळे आता नमुने तपासणी संख्येत वाढत झाली आहे. मात्र, सध्या तरी बाधित सापडण्याचे प्रमाण वाढलेले नाही. दुसरी लाट कधी येईल हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगता येईल. दिवाळी संपली, आता तरी नागरिकांनी स्वत: आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी करोना संरक्षक नियमांचे पालन करावे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. लक्षणे दिसल्यास अंगावर दुखण न काढता तपासणी करून घ्यावी.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका