नवी दिल्ली : इंधनाच्या दरवाढीसकट महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र ही दरवाढ योग्य असल्याचे सांगताना सत्ताधारी पक्षाचे नेते अजब दावे करत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता असाच एक अजब वक्तव्य मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्याने केले आहे. इंधन दरवाढ अटळ असल्याचे या नेत्याने म्हणत दरवाढीला पाठिंबा दिला आहे.
मध्य प्रदेशमधील भाजपाचे नेते आणि मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया यांनी महागाईसंदर्भातएक वक्तव्य केले आहे त्याची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. इंधन दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता लोकांचे पगार वाढले नाहीत का? असा उलट प्रश्न या भाजपा नेत्याने विचारल्याचे पहायला मिळाले. महागाई वाढत असतानाच लोकांचे पगारही वाढत असल्याचा प्रॅक्टीकल विचार करत महागाई स्वीकारली पाहिजे, असे मंत्री महोदय म्हणाले आहेत.
#WATCH | "Hasn't income of the common man increased? Govt can't give everything for free. People should understand that if their income is rising, then they will have to accept inflation also," says Madhya Pradesh Minister Mahendra Singh Sisodia in Indore pic.twitter.com/kpTdogH0Rh
— ANI (@ANI) October 31, 2021
“सरकार सर्व काही मोफत देऊ शकत नाही. त्यामुळे इथून (इंधनावरील करांमधून) सरकारला पैसा मिळतो. याच पैशांमधून सरकारी योजना चालवल्या जातात,” असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. इंधन दरवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता सिसोदिया यांनी आपले मत व्यक्त केले.
पेट्रोल डिझेलचे दर १० वर्षाइतकेच असावेत असं लोक म्हणू शकत नाही. लोकांचे पगारही वाढले आहेत. त्यामुळेच “इंधनाचे दर तसेच राहणं अजिबात शक्य नाही,” असंही सिसोदिया म्हणालेत. मागील काही वर्षांमध्ये सर्वच स्तरातील लोकांचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा या भाजपा नेत्याने केला आहे.
“इंधनदरवाढ झाली तशी पगारवाढ झाली नाहीय का?, लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही का?”, असा प्रश्न मंत्र्याने पत्रकारांनाच विचारला. इतकच नाही तर काँग्रेस सत्तेत असताना वस्तूंचे दर वाढत नव्हते का असा उलट प्रश्नही सिसोदिया यांनी उपस्थित केला आहे. “केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये महागाई वाढली आहे का? ही सातत्याने होत राहणारी गोष्ट असल्याचं आपण मान्य केलं पाहिजे,” असेही ते यावेळी म्हणाले.