म्हसवड – व्यापारी गाळेधारकांच्या भाड्यामध्ये फरक रूपात वाढ करून भरमसाठ फरकाच्या रकमेसहित भाडे भरा व भाडे भरले नाही तर दुकान गाळे खाली करून द्या, असा तगादा म्हसवड नगरपालिकेने लावला असून या गाळेधारकांवर पालिका अन्याय करत असल्याचे निवेदन व्यापारी गाळेधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की हे सर्व गाळेधारक गेली 18 ते 20 वर्षे या गाळ्यांमध्ये व्यवसाय करीत आहेत. गाळ्याची घरपट्टी व इतर सर्व रक्कम नेहमी भरत होते. मात्र 30 जुलै 2017 पासून पालिकेने भाडे भरून घेणे बंद केले. नंतर मागील भाडे फरक रूपात वाढ करून भरमसाठ फरक करून भाडे भरण्याचा तगादा लावला आहे. भाडे नाही भरले तर दुकान गाळे खाली करून द्या, असा तगादा लावला असून आम्ही सर्व जण 30 जुलै 2017 पासूनचे भाड्यात 5 ते 10 टक्के वाढ भरण्यास तयार आहोत.
या गाळ्यामध्ये सलून दुकानदार, घड्याळ दुरूस्त करणारे, चहावाले, किराणा दुकानदार, इलेक्ट्रॉंनिक वस्तूदुरूस्ती असे व्यवसाय करणारे असून करोनाच्या पार्श्वभूमीवर जगणे मुश्कील झाले आहे. रोजच्या खाण्यापिण्याची पंचाईत असताना ही भरमसाठ भाडेवाढ रक्कम या गाळेधारकांना भरणे अशक्य आहे.
तरी प्रशासनाने या सर्व परिस्थितीचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करून मूळ भाड्यात 5 ते 10 टक्के वाढ करून सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर परेश व्होरा, सुरेश बंडे, गुलाब तांबोळी, इर्षाद काझी, अजिनाथ केवटे, सुकुमार राऊत, सुनील सराटे आदींसह गाळेधारकांच्या सह्या आहेत.