सातारा – गृृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. सातारा येथील कार्यक्रम आटोपून सोमवारी पुण्याकडे जाताना महामार्गावर भुईज येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांजवळ थांबून त्यांनी कर्मचाऱ्यांची आस्थेवाइकपणे विचारपूस केली.
गृहमंत्री देशमुख यांनी गेल्या चार दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील करोना आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. सोमवारी देशमुख यांनी सातारा येथे आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. भुईंज गावच्या हद्दीत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार मंगेश महाडिक, सुशांत धुमाळ, भुईंज पोलिस ठाण्याचे हवालदार सतीश पवार कर्तव्य बजावत होते.
यावेळी गृहमंत्र्यांनी याठिकाणी थांबून या पोलिस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. करोना काळात काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलिस कर्मचाऱ्यांची गृहमंत्र्यांनी थांबून चौकशी केल्याने कर्मचारीही आनंदित झाले होते.