नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या स्थापना दिनानिमित्त काल भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या संस्थेला एक सल्ला दिला आहे. सीबीआयसारख्या तपास संस्थांनी त्यांची शक्ती तसेच एखाद्या व्यक्तीचा खासगीपणाचा अधिकार यात योग्य संतुलन राखण्याची आवश्यकता असल्याचे चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
डी. पी. कोहली व्याख्यानमालेत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की तपास संस्थांनी राष्ट्राची सुरक्षा आणि राष्ट्राच्या विरोधातील आर्थिक गुन्ह्यांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सीबीआयला त्यांच्या भ्रष्टाचार विरोधातील तपास संस्थेच्या भूमिकेपेक्षा वेगळ्या अन्य प्रकरणांचा तपास करायला सांगितले जाते आहे. अशा स्थितीत आपल्या आदर्श वाक्याच्या कसोटीवर खरे उतरण्याची मोठी जबाबदारी सीबीआयवर आहे.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आज गुन्ह्याचे क्षेत्र बदलले आहे. त्यामुळे जो नवा ट्रेंड आला आहे त्यामुळे तपास संस्था किचकट आव्हानांचा सामना करत आहेत. सीबीआय आणि अन्य तपास संस्थांनीही त्यांच्या तपास कार्यात तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा.
त्यांनी तपासात सगळ्यांत चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी एआयचाही वापर करायला हवा. आजच्या काळात एआय तंत्रज्ञान गेम चेंजर सिध्द होते आहे. त्याचे कारण या तंत्रज्ञानमुळे अत्यंत क्लिष्ट असे तपशील आणि प्रमुख तथ्ये अगदी सहजपणे समोर आणता येऊ शकतात.