सोलापूर – मिरज – सोलापूर हायवेवर ट्रकने ऊसतोड कामगारांना दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झालेत. हे कामगार ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परतत होते. तेव्हा ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. मृतांपैकी 3 जण चिखलगीचे, तर 1 जण शिरनांदगीचा रहिवाशी आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे कोणतेही साधन नाही.
त्यामुळे येथील बहुतांश नागरीक ऊसतोड करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यासाठी या नागरिकांना सांगली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी जावे लागते.
येथील काही ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ येथे गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून काही मजूर गावाकडे जात होते. सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाला.
त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभे करून दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका ट्रकने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर (30, रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (35), दादा आप्पा ऐवळे (17), निलाबाई परशुराम ऐवळे, (रा. चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले.
या अपघाताचे माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लगतच्या कवठमहांकाळ व मिरज येथील रुग्णालयात हलवले. या दुर्घटनेमुळे चिक्कलगी व शिरनांदगी गावावर शोककळा पसरली आहे.