मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. काँग्रेसच्या अवस्थेबद्दल शरद पवारांनी केलेल्या विधानावर काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने प्रतिक्रिया दिली.
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झाली. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झाली, असं शरद पवार म्हणाले होते.
त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही हे ठरलयं. काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली होती. पण जमीन राखणाऱ्या लोकांनीच जमीन चोरली, डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती आज झाली, असं पवारांचं मत असेल, असं पटोलेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.
काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. अर्थात शरद पवार यांचा इशारा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाकडे होता. त्यावर पटोले म्हणाले की, देशात भाजपाला पर्याय काँग्रेसचं आहे, हे सामान्य जनतेला ठावूक आहे. त्यामुळे कुणाला काय बोलायचं याचा लोकाशाहीत त्यांना अधिकार आहे.