पालघर – विक्रमगड तालुक्यातील आलोंढे गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा अपघात झाला. सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातात दोन्ही बसमधील मिळून जवळपास 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रस्त्यातील वळण वेळीच लक्षात न आल्याने दोन्ही बस समोरासमोर येऊन हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
डहाणू – ठाणे आणि वाडा-जव्हार बस या बस समोरासमोर येऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. विक्रमगडवरून वाडाकडे जाणारी डहाणू-ठाणे-सातारा बस आणि वाड्यावरून येणारी वाडा-जव्हार बस या कोकणी पाडा येथील राईसमिलजवळ एकमेकांना धडकल्या. धडक जोरदार बसल्याने एका बसचा पत्रा चिरला आहे.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा अपघात कैद झाला आहे. दरम्यान, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, 50 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काहींना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.