तेजस फडके
निमोणे – देशात नुकत्याच पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये चार राज्यांत भाजपची सत्ता आली आहे. त्याचा परिणाम राज्यातील आगामी निवडणुकीवरही होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गावागावांत पदभ्रमंतीसाठी सुरू असलेल्या पक्ष प्रवेश तूर्त तरी थांबला आहे.
जिल्ह्यात निवडणुकीची तयारी जोरदार सुरू होती. त्यातच निवडणुक लांबणीचा फतवा निघाला आणि त्यातच चार राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे विविध पदे मिळवण्यासाठी पक्ष प्रवेश करणाऱ्याची इकडे आड अन् तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लवकरच होणार म्हणून अनेक इच्छुकांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आधार घेत पक्ष प्रवेश करण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, सर्वच निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुकांची रणनीती आणि समीकरणेही बदलली आहेत.
सध्या शिरूर तालुक्यातील भाजप सोडण्याबाबत तळ्यात – मळ्यात असलेले इच्छुक संभ्रमात पडले आहेत. पाच राज्यातील निकालानंतर महागाई, पेट्रोल दरवाढ, विकास, भ्रष्टाचार अशा मुद्यावर भाजपला घेरण्याची तयारी केलेल्या विरोधकांना आता निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले अनेकजण पुन्हा भाजपमध्येच थांबण्याची शक्यता आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी शिरूर तालुक्यात भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु पाच पैकी चार राज्यात भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाल्याने राष्ट्रवादीत होणारे इनकमिंग थांबले आहे.
राष्ट्रवादीत बाहेरुन आलेल्या लोकांमुळे मोठा अंतर्गत कलह सुरु झाला आहे. शिरूर तालुक्यातील अनेक गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादीला धोबीपछाड करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नव्यांमुळे जुन्यांची घुसमट?
शिरूर तालुक्यातील अनेक सरपंच व इतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे पक्षाशी प्रामाणिक राहुन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नव्यांच्या आयातीमुळे घुसमट होवू लागली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच निवडणुका लांबल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
कहीं खुशी, कहीं गम
अनेक इच्छुकांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्यातच निवडणुका पुढे गेल्या आहेत. तर आगामी निवडणुकीत ओबीसींनाही प्रतिनिधीत्व मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. जर न्यायालयाने स्थगिती दिली तर निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे काळजी करु नका, असे सुतोवाच केल्यामुळे जिल्ह्यात कहीं खुशी कही गम…असे चित्र तयार झाले आहे.