नगर – गेल्या दोन वर्षात नगर शहरात वाढलेल्या अनधिकृत पत्रा गाळ्यामुळे प्रमुख चौकांसह रस्ते पत्रामय झाल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत दैनिक “प्रभात’ने पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्ताची दखल महापालिकेने उशिरा का होईना घेतली. आज सकाळी महापालिकेने सावेडी उपनगरमधील यशोदानगर परिसरातील पत्रा मार्केटवर हातोडा टाकून 25 ते 30 गाळे जमिनदोस्त केले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केली. या कारवाईमुळे पत्रा गाळेधारकांची एकच धावपळ उडाली. यावेळी तोफखाना पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरासह उपनगरातील सर्वच भागात गेल्या दोन वर्षांपासून अनधिकृत पत्रामार्केटचे पेव फुटले आहे. सावेडी उपनगरासह कल्याण रस्ता, केडगाव, बालिकाश्रम रस्ता, तसेच शहरातील काही भागात मनपाची कोणतीही परवानगी न घेता पत्र्यांचे गाळे उभारण्यात आले आहेत.
खासगी मालकांनी पत्र्यांचे गाळे उभारून हे गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. या पत्रामार्केटमुळे मनपाचे उत्पन्न बुडाले आहे. या प्रश्नी महापालिकेच्या महासभेतही यापूर्वी चर्चा झाल्या होत्या. तसेच ही अतिक्रमणे हटविण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिका प्रशासनाकडून पत्रामार्केटवर कारवाई करण्यासंदर्भात सन 2019 मध्ये सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी 1 हजार 500 पत्राचे गाळे असल्याचे आढळून आले होते. या सर्व्हेनंतर महापालिका प्रशासनाने शहरातील अधिकृत 1 हजार 500 गाळेधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. तसेच या संदर्भात प्रशासनाने सुनावणी देखील घेतली होती.
मात्र करोनामुळे त्यानंतर दोन वर्ष या पत्रामार्केटचा विषय मागे पडला होता. या करोना काळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांनी व्यवसाय सुरू केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात या पत्राच्या गाळ्यांची संख्या 3 हजारच्या पुढे गेली आहे. याबाबत दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल उशिरा का होईना आज महापालिकेने घेतली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने यशोदानगर परिसरातील पत्रामार्केटवर कारवाई करीत गाळ्यांचे अतिक्रमण हटविले. काही गाळेधारकांनी गाळ्यांमधील सामान स्वतःहून काढले. जेसीबीद्वारे गाळ्यांवर धडक कारवाई केली.