नवी दिल्ली – जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलल्यास त्यांना सरकारी पद भुषवण्यास पाच वर्षांसाठी मनाई केली जावी. तसेच, त्यांच्यावर पुढील निवडणूक लढवण्यास बंदी घातली जावी, अशी भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी शनिवारी मांडली.
राजस्थानमधील राजकीय घडामोडींमुळे तेथील कॉंग्रेस सरकारच्या अस्तित्वापुढे संकट निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर, एका वेबिनारमध्ये सिब्बल यांना राजस्थानच्या राजकीय पेचाविषयी प्रश्न विचारण्यात आला.
कुठलाच कायदा पक्षांतर किंवा पक्षबदल रोखू शकत नाही. त्यामुळे सरकारी पद भुषवण्यास किंवा निवडणूक लढवण्यास मनाई या पर्यायांचा विचार व्हायला हवा, असे उत्तर सिब्बल यांनी दिले. नामांकित वकील असल्याने त्यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्व आहे. सत्तेविषयीच्या मानवी लोभातून पक्षांतराची राजकीय साथ पसरते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.