नवी दिल्ली – संसदेची सुरक्षा भेदली जाण्याच्या प्रकरणातील चार आरोपींची दिल्लीतील पटियाला न्यायालयाने आज सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. नीलम आझाद, अमोल शिंदे, सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी त्यांची नावे आहेत. त्यांना १५ दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने ७ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे.
या चौघांपैकी मनोरंजन डी आणि सागर शर्मा यांनी संसदेच्या प्रेक्षागारातून उडी मारली होती तर नीलम आणि अमोल यांनी संसद परिसरात घोषणाबाजी करत धूर पसरवला होता. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की धूर सोडण्यासाठीचा कॅन महाराष्ट्रात खरेदी केला गेला होता. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते.
त्यामुळे त्यांना लखनौ, गुरूग्राम आणि म्हैसूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे आहे. त्यांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करायची आहे. त्यांची बैठक कुठे झाली, त्यांना पैसे कोणी दिले आदी प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. त्याकरता १५ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे. दिल्ली पोलिसांच्या या युक्तीवादावर आरोपींचे रिमांड वकील म्हणाले की यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी पुरेशी आहे.
कोण आहे ललित झा?
संसदेवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटनेला कालच २२ वर्षे झाली. त्याच दिवसाची निवड करून काल म्हणजे बुधवारी संसदेची सुरक्षा भेदण्यात आली. या संदर्भात चार जण अटकेत असले तरी ललित झा नावाचा आणखी एक त्यांचा साथीदार फरार असून तोच या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक त्याच्या मागावर आहे.
त्याच्या अटकेसाठी छापेमारीही सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोलकाता येथील रहिवासी असलेला ललित पेशाने शिक्षक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थोर क्रांतीकारी भगतसिंग यांच्यापासून प्रेरणा घेत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी ललित आणि अन्य आरोपींनी हे कृत्य केले. सोशल मीडियावर परस्परांच्या संपर्कात आल्यावर फेसबुकवर भगतसिंग फॅन पेजला हे सर्व जण जोडले गेले.
वर्षभरापूर्वीच तयार केली योजना
ललित, सागर आणि मनोरंजन हे एक वर्षापूर्वी म्हैसूर येथे भेटले होते. त्यावेळी तेथेच त्यांनी संसदेत शिरण्याची योजना तयार केली होती. नंतर नीलम आणि अमोल यांनाही त्यांनी यात सहभागी करून घेतले. त्यानंतर ललितने नेतृत्व स्विकारले.
तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मनोरंजनला संसदेच्या सर्व एन्ट्री पॉंइटस्ची रेकी करण्यास सांगितले. जुलै महिन्यात मनोरंजन दिल्लीला आला. एका संसद सदस्याच्या नावावर जारी करण्यात आलेल्या व्हिजिटर पासद्वारे त्याने संसदेत प्रवेश केला. तेथे बूटांची तपासणी केली जात नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
आता बुधवारी ललित अन्य चौघांच्या सोबत संसदेत आला होता. मात्र त्यांना केवळ दोनच पास मिळाल्यावर ललितने अन्य चौघांचे मोबाइल आपल्याजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. संसदेच्या आत आणि बाहेर ज्या रंगित कॅनचा शिडकावा करण्यात आला होता, ते अमोलने महराष्ट्रातील कल्याण येथून नेले होते.
१० डिसेंबरला आले एकत्र
ललितचे शेवटचे लोकेशन राजस्थान- हरियाणा बॉर्डरवरील निमराणा असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सर्व आरोपी १० डिसेंबर रोजीच एकत्र आले होते आणि गुरूग्रामच्या विशाल शर्मा यांच्या निवासस्थानी थांबले होते. सुरक्षा भेदण्याची योजना पूर्णपणे समन्वयाने आणि सुनियोजितपणे आखण्यात आली होती. या सगळ्यांची विचारधारा एकसमान असल्यामुळे सरकारला एक कडक संदेश देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.
सहा जणांची योजना?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार सहा जणांनी ही योजना आखली होती आणि हे चार जण त्याच गटाचा भाग होते. मेसेजींग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात राहत या सगळ्यांनी कट रचला. गुरूग्रमाच्या एका फ्लॅटमध्ये ते जमले होते. दरम्यान, या संपूर्ण कटाचा सूत्रधार कोणी दुसराच असल्याचाही पोलिसांना संशय आहे.