Parliament Security Breach : देशात मागच्या आठवड्यात संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य चूक झाली होती. काही तरुणांनी संसदेत घुसखोरी करत धुराच्या नळकांड्या उडवल्या होत्या. याच प्रकरणावरूनविरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, याच प्रकरणावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधी खासदारांच्या वागणुकीवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना विरोधी खासदारांचे वर्तन दुःखद असल्याचे म्हटले. तसेच सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना विरोधकांचा पाठिंबा असल्याचे त्यांच्या वर्तनावरून दिसत असल्याचीही टीका यावेळी त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले,”रोज नवे घोटाळे होत असतानाचे युग नव्या मतदारांनी पाहिले नसेल. विरोधकांच्या त्या कृत्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. तसेच विरोधकांनाही याच ठिकाणी थांबण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. त्यांना पुढे जाण्याची इच्छा दिसत नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोदी म्हणाले, “सध्या या सभामंडपात जी रिकामी जागा आहे, ती जागा पुढच्या वेळी भरली जाईल असे वाटते.”असे म्हटले.
पंतप्रधान मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते भाजप खासदारांना म्हणाले की, “संसदेच्या सभागृहात जे काही घडलं त्याला समर्थन देणं अत्यंत चुकीचं आहे. विरोधकांनी आता फक्त विरोधी पक्षातच बसणार असे ठरवल्याचे दिसत आहे. विरोधक जे काही करत आहेत ते आपली निराशा आणि फक्त निराशा व्यक्त करत आहेत. नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी करणे हे त्याकनच्या उद्दिष्ट आहे तर देशाचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या आणि त्यांच्या विचारसरणीत हाच फरक आहे.”
ते पुढे खासदारांना म्हणाले, “आता सुट्टीची वेळ जवळ आली आहे. तुम्ही लोक दुर्गम ग्रामीण भागात जा आणि विकास कसा झाला ते जाणून घ्या? मी काल काशीला गेलो आणि तरुणांमध्ये आशा निर्माण झाल्याचे पाहिले.”असे म्हणत खासदारांमध्ये विश्वास निर्माण केला.