Uddhav Thackeray – 2024 च्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्या तरी, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. आपल्या नेत्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनविण्याची स्पर्धा आघाडीतील सदस्य पक्षांमध्ये रंगल्याचं दिसत आहे. इंडिया अलायन्स लोकसभा निवडणूक-2024 नितीश कुमार किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवू शकते अशी चर्चा होती. पण आता फासे पालटताना दिसत आहे.
VIDEO | “In today’s meeting, we will discuss various things. We need a coordinator (of the alliance), it is not necessary that the coordinator will go on to lead the alliance, but it is important to have one,” says Shiv Sena (UBT) leader @ShivSenaUBT_ ahead of INDIA bloc meeting… pic.twitter.com/LJcmy9yR7A
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2023
आज दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही दिल्लीला गेले आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीचा चेहरा आता ठरवावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची एकत्रित बैठक झाली नाही. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्ष सामील होते. त्यामुळे या कालावधीनंतर इंडियाची बैठक होत आहे. तीन राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणं आवश्यक आहे. ती चर्चा या बैठकीत होईल. जानेवारीपासून निवडणुकीचं वर्ष सुरू होईल. एप्रिल आणि मे महिन्यात वेळापत्रकानुसार निवडणुका होतील. त्यानुसार तयारीला लागावं लागेल. बाकीच्यांच्या सूचना येतायत त्यावर आमची मते आम्ही मांडू. बैठकीनंतर या विषयावर बोलणं अधिक योग्य राहील.’ असेही ते म्हणाले आहे.
या बैठकीआधी बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सची चर्चा रंगली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारीच दिल्लीत पोहोचले आहेत. आता बैठकीपूर्वी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या चेहऱ्यावर भर दिला जात आहे. या मुद्यावर जेव्हा पत्रकाराने उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले,’आम्ही एकत्र आलो आहोत. कोणाच्याही डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. ज्या पद्धतीने खासदारांचं निलंबन झालं. महाराष्ट्रातील विधिमंडळातील चित्र पाहिलंत, हे बघितल्यानंतर देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजतेय का हा प्रश्न आहे. कोणाच्याही डोक्यात नेतृत्त्वाची हवा नाहीय. देशातील लोकशाही जगली तर देश जगेल. ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया म्हणून एकत्र आलो आहोत.’ असं म्हणत त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली.