पारगाव शिंगवे -करोनाचे संकट दारात असताना आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील ऊस, जनावरांचा हिरवा चारा या पिकांसह, घरं, पॉलीहाऊस, पोल्ट्री व बराकीतील कांदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हाता तोंडाशी आलेली पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांना संकट काळात नुकसानभरपाई मिळावी म्हणून शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी आंबेगाव तालुका महसूल प्रशासनाकडे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून ते शासन स्तरावर पाठविण्यात यावेत अशी मागणी केली आहे.