बेल्हे -जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शनिवार (दि. 6) राजुरी येथे कृषी अधिकारी एस. के. शिरसाठ, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी केली.
यावेळी मंडल कृषी अधिकारी अनिल गंभीरे, सरपंच एम. डी. घंगाळे, कृषी अधिकारी राजश्री नरवडे, चंद्रकांत जाधव, मोहन हाडवळे, अविनाश पाटील औटी, सुभाष पाटील औटी, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ, जयसिंग औटी, तलाठी भाऊसाहेब कुमावत उपस्थित होते.
चक्रीवादळामुळे सुमारे 6 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये केळी, द्राक्षे, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. परिसरात केळीच्या बागाच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जादा भरपाई मिळावी, अशा मागणी पवार यांनी शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
चक्रीवादळामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. घरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, समाज मंदिर, अंगणवाडी, शेती आदी सर्व मिळून तालुक्यात 600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- अतुल बेनके, आमदार, जुन्नर
जुन्नर तालुक्यातील 148 गावांतील शेतीला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. यामध्ये कृषी पिकांचे 40 ते 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 625 हेक्टर केळीचे क्षेत्र जमीनदोस्त झाले आहे. 99 टक्के केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दोन दिवसांत सर्व काम पूर्ण होईल.
– एस. के. शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर.