आशुतोष गोवारीकर यांची भावना : “पानिपत युद्ध शौर्य दिना’निमित्त विशेष कार्यक्रम
पुणे – सरदार वंशजांना भेटताना मला खूप भरून आले. मलाही सुरुवातीला पानिपतबाबत एकच परिच्छेद माहिती होता. लहानपणीदेखील हे पराभवाचे युद्ध आहे, असेच सांगितले जायचे. दिग्दर्शन क्षेत्रात आल्यानंतर पानिपत विषयावर चित्रपट करण्याचे ठरवले. ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्याकडून अधिक माहिती मिळाल्यानंतर हे अवघड असल्याचे समजले. पानिपताच्या युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक सरदारांच्या आहुतीवर संपूर्ण चित्रपट होऊ शकतो, अशी भावना प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली. मुलाखतीवेळी ते बोलत होते.
केंद्रीय सांस्कृतिक विभाग आणि हिंदवी स्वराज्य महासंघाच्या वतीने “पानिपत युद्ध शौर्य दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिग्दर्शक योगेश्वर गंधे यांनी गोवारीकर यांची मुलाखत घेतली. महार रेजिमेंटच्या बॅन्ड पथकाने मानवंदना दिली. तर मंदार परळीकर यांनी “स्वातंत्र्यदेवतेचा’ पोवाडा गायला. ऍड. आदित्य रुईकर यांच्या “बाजीराव-चिमाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पानिपत चित्रपटाचे निर्माते डॉ. रोहित शेलटकर, महासंघाचे अध्यक्ष तंजावरचे शिवाजीराजे भोसले, महामंत्री रणजित नातू, उपाध्यक्ष विजयसिंह मोहिते, कार्याध्यक्ष महेंद्रसिंह पेशवा यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्याकडे अनेक लढाया झाल्या. युरोपातदेखील झाल्या. युरोपामध्ये लढाईबाबत गर्वाने बोलले जाते. आपल्याकडे झालेल्या “पानिपत’च्या लढाईसारखी लढाई कोठेही झाली नाही. त्यामुळे ही गोष्ट जगाला दाखविणे गरजेचे होते. या चित्रपटाची पटकथा तयार व्हायला 2 वर्षे लागली. भारतात या चित्रपटावर अनेक ठिकाणी बंदी आली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर आम्हांला विरोध झाला, अनेकांनी केसेस ठोकल्या. चित्रपट तयार होताना या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते, असे सांगत मराठा साम्राज्याचा मोठा इतिहास आपल्याकडे आहे, याची कोणाला माहिती नाही. मनोरंजन होत असतानाच, पानिपत सगळ्यांच्या मनात रूजत आहे, असा विश्वास गोवारीकर यांनी व्यक्त केला.
व्यावसायिक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले असते, तर हा चित्रपट झाला नसता. यामध्ये “पॅशन’ होते. या चित्रपटाची निर्मिती माहिती आणि शिक्षणासाठी केली. आपल्याकडे याच दृष्टीने चित्रपटांची निर्मिती झाल्यास चित्रपट हे समाजप्रबोधनाचे उत्तम माध्यम होऊ शकेल, असे चित्रपटाचे निर्माते डॉ. शेलटकर म्हणाले.
विजयसिंह मोहिते यांनी प्रास्ताविक केले. रणजित नातू यांनी आभार मानले. तर मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.