शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संभाजीराजेंवर टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि राज्यासह देशभरात आणखी एका वादाला तोंड फुटले. दरम्यान, या पुस्तकावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना मान्य आहे का ? अशी विचारणा केली होती. तसेच आज पुन्हा त्यांनी याच विषयावरून महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे राज्यात शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह सर्वच पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यातच संजय राऊत यांनीही रविवारी राज्यातील भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती. यानंतर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत नेमकी भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणे राज्यातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
आपल्या आधीच्या वक्तव्यासंबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपात आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या म्हटले तर चिडण्याचे कारण नाही. महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असं आहे का? महाराजांची अशा पद्धतीने तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी मांडले.
यावेळी संजय राऊत यांनी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यासंबंधी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी आज सकाळी सविस्तर चर्चा झाली. त्यांनी आपली भूमिका योग्य असल्याचे सांगितले आहे. जनता भूमिका घेत असेल तर वंशजांनीही भूमिका घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपा नेते संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची यामध्ये काही चूक नसल्याचे म्हटले. नरेंद्र मोदी महान व्यक्ती आहेत, त्यांचा आदर करतो, पण महाराजांशी तुलना करणे योग्य नाही. पंतप्रधानांच्या अपरोक्ष ही चमचेगिरी चालते. याबद्दल त्यांना काही माहिती नसते. हे पुस्तक मागे घेतले पाहिजे, त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. तसेच भाजपाने याच्याशी आपला संबंध नाही हे जाहीर केले पाहिजे,अशी मागणी संजय राऊत यांनी केली.