महर्षी वाल्मिकी संघाचं नदी पात्रातच “हटके’ आंदोलन
सोलापूर – चंद्रभागा नदीमध्ये सतत वाळू चोरी असल्याने नदीमध्ये खड्डे पडुन भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महर्षी वाल्मिकी संघ या संघटनेच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात वाळुचोरीमुळे पडलेल्या खड्ड्यांना चक्क “पंढरीचे धोतर’ पांघरुन हटके आदोलन करत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
चंद्रभागा नदीपात्रातील वाळू चोरी थांबविण्यात यावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बैठकीमध्येही प्रश्न मांडला. यावेळी खुद्द पालकमंत्री यांनी ही वाळे चोरी थांबवा अन्यथा बेजबाबदार अधिकार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले होते. परंतु अद्यापही नदीपात्रामध्ये राजरोसपणे वाळु चोरी सुरूच आहे.
वाळु चोरीमुळे नदीपात्रामध्य मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे स्नान करण्यासाठी येणार्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या आषाढी वारीचा सोहळा काही दिवसांवर येवून ठेपला असून या कालावधीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा सवाल याबाबत बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला.