पुणे, ता. 29 – पंचायत राज्यव्यवस्था हे आर्थिक विषमता आणि सामाजिक अन्याय यांचे कारण आहे असे समजणे साफ चूक आहे, असे आज अखिल भारतीय पंचायत परिषदेचे जनरल सेक्रेटरी भाऊसाहेब नातू यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, काही राज्यांतील खेड्यांत पंचायत समित्या भांडवलदार व जमीनदार यांच्या हातात गेल्या आहेत.
परंतु असे आहे म्हणून ही पंचायत पद्धतीच रद्द करा, असे म्हणणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास केल्यासारखे होईल. वस्तुतः लोकशाहीची मुळे खोलवर रुजण्यासाठी पंचायत राज्यपद्धती अत्यंत आवश्यक आहे. काही राज्यांनी पंचायत समित्या रद्द केल्या. पण पंचायत कारभार सर्व देशात असलाच पाहिजे व घटनेने तशी सक्ती केली पाहिजे. घटनेतील मार्गदर्शक तत्त्वात पंचायत राज्यपद्धती सुचविलेली आहे.
कॉर्पोरेशनच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्धार
पुणे – पुणे महापालिकांच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळागृहे, सांस्कृतिक कार्यक्रम, विषय मंडळे, शाळासुधार समित्या, भरपूर शैक्षणिक साहित्य, शिक्षक प्रशिक्षण आदी विविध समस्यांचा अभ्यास करून निश्चितपणे गुणवत्ता वाढविण्याची जिद्द शिक्षण मंडळाने ठेवली आहे अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव शिंदे यांनी दिली.
मिश्र वैद्यकाची जरुरी का आहे?
पुणे – महाराष्ट्रात यंदापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या बीएएमएस या शुद्ध आयुर्वेद अभ्यासक्रमात आधुनिक वैद्यकशास्त्राचाही (ऍलोपॅथी) समावेश करणे आवश्यक आहे, असे मत पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद विद्याशाखेचे माजी डीन दादासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केले.