नवी दिल्ली – दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याची बाब जगजाहीर आहे. त्यामुळे पाकिस्तानने कितीही नाकारले तरी सत्य दडणार नाही, अशा शब्दांत भारताने कांगावाखोर शेजाऱ्याला फटकारले आहे.
भारत आणि अमेरिकेत नुकतीच महत्वपूर्ण 2+2 मंत्रिस्तरीय चर्चा झाली. त्या चर्चेनंतर दोन्ही देशांकडून जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनातून दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची कानउघाडणी करण्यात आली. भारत-अमेरिकेच्या संयुक्त निवेदनात आपला उल्लेख करण्याला पाकिस्तानकडून आक्षेप घेण्यात आला.
आमचा उल्लेख अनावश्यक आणि दिशाभूल करणारा असल्याचा कांगावा त्या देशाने केला. त्यावर गुरूवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया दिली. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या अनेकांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे. त्यामुळे स्वत:च दहशतवादाचा बळी ठरल्याचा खोटा दिखावा पाकिस्तानने करू नये.
त्या देशाकडून दहशतवादाला पाठिंबा दिला जात असल्याचे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. तशा पाठिब्यांची कबुली पाकिस्तानी नेतेही वारंवार देताना दिसतात, याकडे श्रीवास्तव यांनी लक्ष वेधले.