इस्लामाबाद – पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार “नालायक’ असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात सर्व पक्षांच्या नेत्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. शरीफ या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
जे राजकीय नेते सत्तेवर आले त्यांना फासावर लटकवले गेले. तुरुंगात टाकले गेले. त्यांची हत्या झाली किंवा त्यांना अपात्र ठरवले गेले. पाकिस्तानला कायमच लोकशाही प्रक्रियेपासून वंचित ठेवले गेले आहे. निवडणूकीतील मतांचा आदर राखला जात नाही, तेंव्हा सर्व लोकशाही प्रक्रियाच निरर्थक बनते.
निवडणूकीपूर्वीच कोणी निवडणूक जिंकायची आणि कोणी निवडणूक हरायची, हे जेंव्हा निश्चित केले जाते, तेंव्हा जनतेचा कसा विश्वासघात केला जाऊ शकतो, याचा अंदाज सहज करता येतो. जनाधार कसा चोरला जाऊ शकतो, याची कल्पना करता येऊ शकते, असे शरीफ म्हणाले.
पाकिस्तान ही प्रयोगशाळा बनली आहे. कोणत्याही पंतप्रधानांना 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला जात नाही, हे आता पाकिस्तानमधील लहान मुलांनाही माहिती झाले आहे. हा जनाधार लुबाडणाऱ्या लोकांना याबद्दल जबाबदार धरले जायला पाहिजे.
गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थकारण पूर्णपणे उद्ध्वस्त केले गेले आहे. पाकिस्तानी रुपयाचे अवमूल्यन आता नेपाळी रुपयापेक्षाही खाली झाले आहे. सध्याच्या सरकारने हुकुमशहांना मोकळे रान सोडले आहे, तर जे लोक कायद्याचे पालन करतात त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, अशी टीकाही शरीफ यांनी केली.