मंचर/पारगाव शिंगवे -आंबेगाव व जुन्नर तालुक्यात झालेल्या शनिवारी (दि. 20) मुसळधार पावसामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहाणी केली. त्यावेळी ते लाखणगाव येथे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य रविंद्र करजंखिले, अजित चव्हाण, कल्याण हिंगे, माजी सरपंच रवी वळसे, महादेव कानसकर, बबन वाळुंज, मार्तंड टाव्हरे, कुंडलीक पोखरकर, किसन टाव्हरे, महेश भोजणे, माऊली पाटील, निलेश रोडे, राहुल पाचारणे तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, तसेच सातगाव पठार भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला होता. या परिसरातील शेतीचे तसेच शेतातील, बाजरी, बिट, ऊस, तरकारी, चारा तसेच कडधान्य पिकांचे नुकसान झाले त्याचबरोबर घरामध्ये पाणी साचले होते. जुन्नर तालुक्यातील शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली.
करोनामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतातील मालाला बाजारभाव नाही. कांद्यावरील निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आता मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. मी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून या नुकसानीची माहिती दिली आहे. आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये
लाखणगाव- आंबेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.