इस्लामाबाद: भारतविरोधाने पछाडलेल्या पाकिस्तानकडून आणखी काही उठाठेवी केल्या जाण्याची शक्यता आहे. आता भारतासाठी पुन्हा आपली हवाई हद्द बंद ठेवण्याचा विचार त्या देशाने सुरू केला आहे.
भारताने नुकतेच धडक पाऊल उचलताना जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्मीरवर वक्रदृष्टी ठेवणारा पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यातून त्या देशाने भारतविरोधी थयथयाट वाढवला आहे. काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. तशातच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. त्या बैठकीत भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून मनाई करण्याच्या निर्णयावर विचार झाला. आता कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यावर तो निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी पाकिस्तानी रस्त्यांचा वापर केला जातो. त्या वापरावरही बंदी घालण्याचा विचार पाकिस्तानकडून केला जात आहे. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला होता. त्यावेळी भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने हवाई हद्द बंदी लागू केली होती. ती बंदी मागील महिन्यात उठवण्यात आली होती.