“खरीप’ शब्द वगळल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ
मुंबई: जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरिपाच्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या निर्णयात सरकारने सुधारणा केली असून खरीप हा शब्द वगळून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बॅंकांचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. यामुळे ऊसासह अन्य पिकांनाही नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.
सांगली, कोल्हापूर, व कोकणासह अन्य भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, त्यामध्ये खरीप 2019 हंगामामधील पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे ऊस व अन्य पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये आधीच्या निर्णयात सुधारणा करून प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बॅंका, ग्रामीण बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमार्फत बाधीत शेतकऱ्याने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकावरील बॅंकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बॅंकांना देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले नाही. मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे. तसेच गाळाने भरलेली, खरडलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार आहे. पूरग्रस्त भागात आणखी चार महिने मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.