श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी दोघा जणांचे अपहरण करुन एकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यानंतर घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना ठरली आहे.
पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्राल परिसरातील राजोरी जिल्ह्यातील रहिवासी अब्दुल कादिर कोहली आणि श्रीनगरमधील खोनमोह येथील मंजूर अहमद यांचे काही बंदुकधाऱ्यांनी अपहरण केले.
दरम्यान, तपासपथकाला कोहली नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून त्याची दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी केल्यानंतरचा हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. तत्पूर्वी, 20 ऑगस्ट रोजी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. यात एक विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाला होता. सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये 5 ऑगस्ट नंतरची ही पहिलची चकमक होती.