इस्लामाबाद – पाकिस्तान हा मोठा चमत्कारीक देश आहे. त्या देशात लोकशाही आहे, हा त्यापेक्षाही मोठा चमत्कार आहे. तेथील इम्रान खान सरकारच्या विरोधात विरोधकांच्या आघाडीने जोरदार निदर्शने सुरू करून सरकारला जेरीस आणले आहे. त्यातच आता सरकारी कर्मचारीही रस्त्यावर उतरले आहेत.
महागाईच्या प्रमाणात वेतनवाढ द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यांनी याकरता निदर्शनांचा धडाकाही लावला आहे अन आता तर सचिवालयासमोरच धरणे आंदोलन केले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनांच्या सत्राने बेजार झालेल्या सरकारने अखेर अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला व निदर्शकांना पांगवले. बरेच दिवस या नळकांड्या पडून होत्या. त्यांचा वापर करून त्यांची चाचणीही होउन गेली असे विधान वर चक्क एका मंत्र्याने केले आहे.
पाकिस्तानच्या एका आघाडीच्या दैनिकानेच रावळपींडीतील संबंधित मंत्र्यांच्या सभेचे वार्तांकन करणारे वृत्त छापले आहे. त्यात मंत्रिमहोदयांची ही मुक्ताफळे त्यांनी जगजाहीर केली आहेत.
शेख रशीद अहमद असे मंत्र्याचे नाव आहे.
आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर गरजेचा होता. मात्र आम्ही जास्त नाही फक्त 1 हजार नळकांड्या फोडल्या असा दावा त्यांनी केला आहे. सोबतच बऱ्याच काळापासून पडून असलेल्या या कांड्यांची चाचणीसाठी ते आवश्यकही होते अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
आपल्या उर्वरीत भाषणात मात्र त्यांनी पंतप्रधान इम्रान खान आणि लष्कर आणि त्यांच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. करोनामुळे देशाची स्थिती बिघडली आहे. अशा काळात सरकारला सहकार्य करण्याऐवजी आंदोलने केली जात असल्यावर त्यांनी टीका केली.