अहमदाबाद -करोना संकटामुळे गुजरातच्या चार प्रमुख शहरांत लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 28 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये रात्रीची संचारबंदी असेल. अर्थात, संचारबंदीची वेळ एक तासाने कमी करण्यात आली आहे. आता रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत संबंधित शहरांत संचारबंदी असेल.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गुजरातच्या चार शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. तिची मुदत चौथ्यांदा वाढवण्यात आली आहे. मागील वर्षाच्या अखेरीस त्या राज्यात दरदिवशी सरासरी 1 हजार 500 नवे करोनाबाधित आढळत होते. ती संख्या आता 250 पर्यंत खाली असली तरी गुजरात सरकारकडून दक्षता घेतली जात आहे.