भारतीय दूताकडे नोंदवला निषेध
इस्लामाबाद – भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेवर नेझापीर आणि राखचिकरी सेक्टर मध्ये 14 फेब्रुवारीला शस्त्रसंधीचा भंग करून तुफानी मारा केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानने आज भारतीय दुताला समन्स जारी करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात बोलावून घेतले आणि त्यांना या प्रकरणात समज देत या घटनेचा निषेध नोंदवला.
या गोळीबारात पाकिस्तानी हद्दीतील एक तेरा वर्ष वयाची मुलगी जखमी झाली आहे. तेथे बांधण्यात आलेल्या सीमा भिंतीला लक्ष्य करून तसेच नागरी वस्त्यांना लक्ष्य करून भारतीय जवानांनी सातत्याने तोफगोळ्यांचा मारा पाकिस्तानी हद्दीत केला आहे असा त्यांचा आरोप आहे. हा गोळीबार अजूनही थांबलेला नाही असे पाक परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
सन 2017 पासून आत्तापर्यंत 287 वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन करीत पाकिस्तानी हद्दीत गोळीबार केल्याचा आरोप पाकिस्तानी बाजूकडून करण्यात आला आहे. भारताने संयुक्तराष्ट्रांच्या लष्करी निरीक्षण पथकाला या भागात देखरेख ठेवण्यासाठी तैनात केले पाहिजे असे पाकिस्तानने सुचवले आहे.