नवी दिल्ली – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सुमार अर्धा तास भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महिला सुरक्षेच्या संबंधात आंध्रप्रदेश सरकारने काही कडक कायदे संमत केले आहेत या कायद्यांना केंद्र सरकारकडून त्वरीत मान्यता दिली जावी अशी प्रमुख मागणी त्यांनी यावेळी शहा यांच्याकडे केली.
आंधप्रदेश सरकारने बलात्कारा सारख्या प्रकरणातील खटल्याचा निकाल 21 दिवसांत लावावा आणि बलात्काराबद्दल फाशीची शिक्षा दिली जावी अशी तरतूद केलेला कायदा संमत केला आहे. तसेच लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात असलेली शिक्षाही त्यांनी वाढवली आहे.
आंधप्रदेश सरकारने विधान परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून राज्याला तीन राजधान्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कायद्यांनाही त्वरीत मंजुरी मिळावी अशी मागणी त्यांनी केंद्राकडे केली आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राने निधी द्यावा अशी विनंतीही त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली. या भेटीच्यावेळी वायएसआर कॉंग्रेसचे खासदारहीं तेथे उपस्थित होते.