नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर सातत्याने युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने सीमा रेषाजवळील बाघ आणि कोटली सेक्टरमध्ये दोन हजार तुकड्या तैनात केल्या आहेत. नियंत्रण रेषेजवळ असणाऱ्या भागामध्ये पाकिस्तानने ही सैन्य तैनाती केली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननेनियंत्रण रेषेपासून 30 किलोमीटरच्या भागामध्ये या सैनिकांना तैनात केले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे जाळे पुन्हा एकदा सक्रीय केले आहे. लष्कर-ए-तोयब आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी स्थानिक आणि अफगाणि तरुणांची भरती सुरु केली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हालचाली वाढल्या आहेत.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद भडकवण्याचे प्रयत्न सुरु असताना पाकिस्तानी सैन्याच्या नियंत्रण रेषेवरील हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे असे चित्र निर्माण करुन पाकिस्तान काश्मीर प्रश्नात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. या हालचालींवर भारतीय लष्कराचे बारीक लक्ष आहे.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानने घुसखोरांना मदत करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ 100 पेक्षा जास्त एसएसजी कमांडो तैनात केले आहेत. आतापर्यंत भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 10 एसएसजी कमांडो ठार झाले आहेत. गुजरातच्या जवळ असलेल्या सर क्रीकमध्येही पाकिस्तानने स्पेशल फोर्स तैनात केली आहे.