संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन
नवी दिल्ली – दहशतवादाला आळा घालण्यासाठी एकत्रित आंतरराष्ट्रीय कृतीचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरिया भेटीदरम्यान, “सेऊल संरक्षण संवाद 2019′ मध्ये ते बोलत होते. जगासमोर सध्या संरक्षणविषयक अनेक आव्हाने असून दहशतवाद हे त्यापैकी सर्वात गंभीर आव्हान असल्याचे ते म्हणाले. दहशतवादाविरोधात भारताचे संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर मंचावरुनही नेहमीच द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सक्रीय सहकार्य राहिल्याचे ते म्हणाले.
इतिहासात भारत कधीच आक्रमक राहिलेला नाही. तसेच यापुढेही भारत आक्रमक असणार नाही. मात्र याचा अर्थ स्वतःच्या संरक्षणासाठी भारत आपल्या क्षमतेवर नियंत्रण आणणार नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. या प्रसंगी दक्षिण कोरियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
राजनाथ सिंह तीन दिवसांच्या दौऱ्यावर सेऊल येथे दाखल झाले. त्यांनी ट्विटरवर अनेक पोस्ट केल्या आहेत. ते म्हणाले, संरक्षण मुत्सद्देगिरी ही भारताच्या सामरिक टूलकिटचा महत्त्वाचा आधार आहे. खरे तर संरक्षण मुत्सद्दीपणा आणि मजबूत संरक्षण दलांची देखभाल करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते एकमेकांना सामोरे जात आहेत, ते म्हणाले.